Monday, June 2, 2025
HomeदेशKIRAN MANE:अखेरचा सलाम सिद्धार्थला: औरंग्याच्या कबरीच्या धुरळ्यात झाकलेला बलिदान आणि 'जग्वार'चा प्रश्न

KIRAN MANE:अखेरचा सलाम सिद्धार्थला: औरंग्याच्या कबरीच्या धुरळ्यात झाकलेला बलिदान आणि ‘जग्वार’चा प्रश्न

पुणे: ज्यावेळी देशातील राजकीय पटलावर औरंगजेबाच्या कबरीवरून विधानसभेपासून संसदेपर्यंत निरर्थक गदारोळ सुरू होता, जनतेच्या जगण्या-मरण्याशी थेट संबंध नसलेल्या एका विषयावर वादंग माजवला जात होता, नेमक्या त्याच वेळी देशाने एक जिगरबाज सुपुत्र गमावला. ‘जग्वार’ या वादग्रस्त लढाऊ विमानामुळे फ्लाईट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांना वीरमरण आले. मात्र, दुर्दैवाने, ही बातमी मुख्य प्रवाहातील माध्यमांपर्यंत पोहोचू नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आली, जणू काही औरंगजेबाच्या कबरीवरील धुरळ्यात हे बलिदान सहजपणे झाकले जावे.

फ्लाईट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव, एक देखणा, उमदा तरुण. ज्याच्या पणजोबापासून चार पिढ्यांनी भारतीय सेवेत देशसेवा केली होती. रक्तातच लढवय्या वृत्ती असलेला हा जवान. अवघ्या दहा दिवसांपूर्वी त्याने आपल्या प्रेयसी सानियाला फिल्मी स्टाईलमध्ये, गुडघ्यावर बसून प्रपोज करत अंगठी घातली होती. त्यांच्या भावी आयुष्याची स्वप्ने नुकतीच अंकुरली होती.

२ एप्रिल रोजी सिद्धार्थ आपल्या नेहमीच्या प्रशिक्षण उड्डाणासाठी ‘जग्वार’ विमान घेऊन निघाले. त्यांच्यासोबत को-पायलटही होते. आकाशात उंचीवर पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात आले की विमानात तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यांनी ‘इजेक्ट’ (विमानातून बाहेर पडणे) करण्याचा निर्णय घेतला. को-पायलटने पॅराशूटसह उडी मारल्यामुळे ते बचावले. परंतु, सिद्धार्थच्या लक्षात आले की हे विमान एका गावावर कोसळणार आहे, ज्यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी सिद्धार्थने हे विमान एका मोकळ्या जागेवर आणण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यांना ‘इजेक्ट’ करण्याची संधी मिळाली नाही. निष्पाप नागरिकांचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात आपला हा जिगरबाज जवान शहीद झाला.

KIRAN MANE

‘जग्वार’ एअरक्राफ्ट नेहमीच वादग्रस्त राहिले आहे. २०१५ पासून एक नाही, दोन नाही, तब्बल पन्नास विमाने कोसळली आहेत. १४० विमानांपैकी ६५ विमाने भंगारात काढावी लागली आहेत. तरीही आपल्या जवानांचा जीव या धोकादायक विमानांमध्ये का घातला जात आहे, हा प्रश्न अनुत्तरित आहे. या गंभीर विषयावर माध्यमांनी सरकारला जाब विचारणे, चर्चासत्रे आयोजित करणे तर दूरच राहिले, ही बातमी जनतेपर्यंत पोहोचू नये याची पुरेपूर खबरदारी घेण्यात आली. चारशे वर्षांपूर्वी हयात नसलेल्या औरंगजेबाची कबर त्यांना जास्त महत्त्वाची वाटली. त्या कबरीवरच्या धुरळ्यात हे देशासाठीचे बलिदान बेमालूमपणे झाकले गेले.

आज ‘तिरंगा रॅल्या’, ‘खून में सिंदूर’, ‘रोड शो’ यांसारख्या ‘इव्हेंट्स’मागे काय-काय लपवले जात आहे, याचा अंदाज आपल्याला यायला हवा. आपला देश अत्यंत भिषण काळातून जात आहे. आज आपण जागरूक नाही राहिलो, मुग गिळून गप्प बसलो, तर पुढच्या पिढ्या या भाकड काळाच्या तोंडावर थुंकतील हे लक्षात ठेवा.

सिद्धार्थची जान असलेल्या सोनियाला तर ‘सिंदूर’सुद्धा मिळाले नाही हो… “बेबी तूने वादा किया था.. मुझे ले जाने के लिए क्यों नहीं आया तू” हा तिचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता!

सलाम सिद्धार्थ… त्रिवार सलाम. जय हिंद. 🇮🇳

Most Popular